कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीचे जोडे पुसू लागल्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेतली. अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही म्हणून आम्ही बाहेर पडल्याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोकणातील बारसू प्रकल्पासाठी ठाकरे यांनीच पंतप्रधानांना पत्र दिले होते. आता तेच विरोध करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, ‘उध्दव ठाकरे चुकीचे बोलून स्वत:ची किंमत कमी करुन घेत आहेत. बारसू हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे. तो महाराष्ट्राबाहेर नेऊ नये, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती. हा पर्यायवरणपूरक प्रकल्प आहे असे सांगून उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. केवळ राजकारणासाठी ते आता याच प्रकल्पाला विरोध करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेले म्हणून आदित्य ठाकरे खोटे बोलत फिरत आहेत.
या प्रकल्पातून एक थेंबही पाणी बाहेर पडत नाही. प्रदूषण होत नाही. आंबा, काजू, नारळाला धोका बसणार नाही. माशांवर याचा परिणाम होणार नाही. हा जनतेचा प्रकल्प आहे. आंदोलकांना चर्चेचा मार्ग खुला केला आहे. चर्चेतून हा प्रश्न सोडवता येणार आहे. मेट्रोसाठी तुम्हीच आडवे पडला. कोणत्या टोकाला जावून विरोध करता हे लक्षात घेतले पाहिजे. खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.