पुणे | केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून प्रवरानगरमध्ये आज पहिली सहकार परिषद पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. तसेच भाजपचे पधादिकारी सुद्धा उपस्थित होते.
यावेळी बोलत असतांना अमित शहा म्हणाले की, साखर कारखान्यांच्या समस्या राज्याच्या पातळीवर का सोडवल्या जात नाहीत. या समस्यांवर दिल्लीत का सुनावणी घ्यावी लागते? असा सवाल करत ते म्हणाले की,मी सर्वांना सांगतो, मला सल्ला देण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून पाहा. राजकारण बाजूला ठेवून सहकाराला पाहण्याची तुम्हाला अधिक गरज आहे.
सहकार क्षेत्रात पक्षपात होत आहे. त्यामुळे मी हा पक्षपात मूकदर्शक बनून पाहू शकत नाही. तो दूर करणं माझी जबाबदारी आहे. तेच सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून काम केलं पाहिजे. आम्ही बँका वाचवण्यासाठी जे काही करायचे ते करू. बँका वाचवण्यासाठी आता नव्या कमिट्या स्थापन करणार नाही. कमिट्या तयार करून वेळ घालवणार नाही. अनके समित्या बनल्या, अनेक अहवाल आले असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.