मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राहुल बजाज यांना आदरांजली

 

मुंबई | राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला आणि देशासमोरील समस्यांवर निर्भीडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर हिंदुस्थानचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱया अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली.

आज एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवरदेखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते. राहुल बजाज हे विशेषतः उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योगविश्वाचे नुकसान झाले आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे श्रद्धांजली संदेशात म्हणतात.

Team Global News Marathi: