नगर | केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला धमकविण्याचा प्रकार यापूर्वी राज्यात कधीही घडला नाही. या तपास यंत्रणांना बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या वनस्पतींच समुळ उच्चाटन करण्याचे धाडस त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दाखवावे, असे आव्हान भाजप नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आज दिले.लोणी येथे ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती.
आ. विखे पाटील म्हणाले, स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहे. सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करतांनाच वनस्पती असल्याचं सांगणाऱ्या नेत्यांनाही आवाहन करुन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा नायनाट करा, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना.. अंगण वाकडे..’ अशीच झाली आहे. काहीही झाले तरी, केंद्राकडे बोट दाखवायचे एवढाच धंदा त्यांचा सुरु आहे. लसीकरण जास्त झाले तरी, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतही राज्य सरकार दुजाभाव करीत आहे.