मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाबरीमशिदी संदर्भात वक्तव्य करत भारतीय जनता पक्षाला टोला लगावला होता. मात्र यावरून आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त करत आघाडीमधल्या मुस्लिम नेत्यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोट होते. यावरून पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
आझमी यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाहीत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती असे वक्तव्य करत संताप व्यक्त केला होता.