पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला अहमदनगरचे जिल्हा प्रशासन परवानगी देत नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. त्याबद्दल पडळकर यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, चौंडीचे प्रशासन प्रस्थापित पवारांच्या दबावाखाली असल्याची टीका केली आहे.
यावेळी गोपिचंद पडळकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही. कृपया असे कृत्य करू नये. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा दिला आहे.
गोपिचंद पडळकर यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हिंदू संस्कृतीच्या जिर्णोध्दारकर्त्या, कुशल प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी चौंडी येथे दिमाखदार जयंती साजरी केली जाते. चौंडी येथील जयंतीचा कार्यक्रम सर्वधर्मीय आणि सर्व जातीधर्माच्या लोकांचा असतो. त्यामुळे लाखो लोक चौंडी येथे माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात.
यंदादेखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र अजूनही जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे गोपिचंद पडळकर यांनी म्हटले आहे.