मुंबई | खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरवात केली होती. अशातच सोमवारी राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे वाचन त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर केले. संभाजी छत्रपती यांच्या काही मागण्या मान्य झाल्याने त्यांनी काल उपोषण मागे घेतले. मात्र यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
पाटील आपलय ट्विटमध्ये म्हणतायत की, “छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे.”, अशी अपेक्षा व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.