राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना छत्रपती संभाजी राजेंनी राज्य सरकारला ६तारखेपर्यंत निर्णय गेण्यासाठी अल्टिमेट दिला आहे. त्यातच आजच्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली, ही गोष्ट लोकांना रुचलेली नाही. त्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संभाजीराजे छत्रपती हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षाने करुन घेतली आहे. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींना या उपकाराची आठवण करुन दिली. त्यामुळे आता छत्रपती काय भूमिका घेतात, हे पाहावे लागले, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून मराठा आरक्षणाची लढाई आता दिल्लीच लढणे कसे गरजेचे आहे, याविषयी भाष्य करण्यात आले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तिढा जसा दिल्लीत पडला होता तसाच मराठा आरक्षणाचा तिढा दिल्लीतच पडला पाहिजे. हा तिढा दिल्लीनेच सोडवावा. महाराष्ट्राला तो अधिकार नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी आता याप्रश्नी लढाईचे मैदान दिल्लीतच ठरवले तर निकाल लागेल.
राजधानी दिल्लीत ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाची गोलमेज परिषद घेण्याचे कोल्हापूरच्या छत्रपतींनी ठरवले आहे. ही परिषद राजकारणविरहीत व्हावी. बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून दिल्लीला त्या गोलमेज परिषदेची दखल घ्यावीच लागेल. मराठा आरक्षणप्रश्नी कोणीही दुटप्पी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्ष मराठा आरक्षणाचा हत्याराप्रमाणे वापर करत असतील तर ते रोखले पाहिजे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.