केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह्य टीका केल्यानंतर राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. या विरोधात आता राणे आणि शिवसेना हा वाद आणखी उफाळून आलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत एकप्रकारे राणेंच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.
पाटील म्हणाले की, “हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, “प्रत्येकाची स्टाईल असते, त्यात व्यक्तिगत असूया नसते. पण अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. मी त्याचं समर्थन करत नाही. कोकणात शिव्यांशिवाय बोलणंच पूर्ण होत नाही. ते असूयेपोटी नसतं, रागापोटी नसतं” असा दावा पाटलांनी केला.