केंद्र सरकारने संसदेमध्ये देशात ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल सादर केला होता. याच मुद्द्यावरून कॉन्रेस पाठोपाठ सर्व विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरणही या अहवालामुळे चांगलंच तापलं होत,
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी याच मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात कोविड संदर्भात पारदर्शक आकडेवारी उपलब्ध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
केंद्र सरकारकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे. ती केंद्र सरकारचं कौतुक करणारी आकडेवारी आहे, आणि तिच एक दिवस देशाला बुडवू शकते. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवार यांनी केंद्र सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. त्याचबरोबर रोहित पवारांनी एका वृत्तपत्राच्या बातमीचा फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोमधील बातमी मे २०२१ची असून, त्यामध्ये तिरूपती येथील रूग्णालयात ऑक्सिजन अभावी ११ जणांचा मृत्यू झाला असल्याचं लिहिलं आहे.