मुंबई | उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या महाराष्ट्र बंदला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळला. मात्र, राज्यातील भाजपा आणि मनसेने या महाराष्ट्र बंदला विरोध केला. भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद फसल्याचा दावा केला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. “आपल्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला नको? म्हणूनच आजचा हा बंद आहे. यामुळे कोणत्याही पक्षाला त्रास होण्याचं कारण नाही. काहींना हा बंद राजकीय वाटत आहे. पण ज्यांना ही राजकीय भूमिका वाटत असेल त्यांनी आत्मचिंतन करावं”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला नको? म्हणूनच आजचा हा #महाराष्ट्र_बंद आहे.यामुळं कोणत्याही पक्षाला त्रास होण्याचं कारण नाही.काहींना हा बंद राजकीय वाटतोय.पण ज्यांना ही राजकीय भूमिका वाटत असेल त्यांनी आत्मचिंतन करावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 11, 2021
तसेच, “राज्यात व्यापारी, कामगार आणि इतर सर्व घटकांकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. हे पाहून सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांना सलगपणे पत्रकार परिषदा घेऊन बंद अयशस्वी झाल्याचं पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, यातच हा बंद यशस्वी झाल्याचं स्पष्ट होतं”, असे रोहित पवार म्हणाले.