एकिकडे निसर्गाच्या प्रकोपाला मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात सामोरे जावे लागत असताना मुंबईतील उरलेल्या सुरल्या मोकळ्या जागा आरक्षणे बदलून बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. वांद्रे पश्चिम येथील अशाच २२ भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा निषेध करीत महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी आज वांद्रे येथे निदर्शने केली.
मुंबईच्या २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून या आरखड्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियोजन समितीने अनेक आरक्षणे बदलून मुंबईकरांच्या हक्काच्या मोकळ्या जागा बिल्डरांना आंदणच दिल्या आहेत. वांद्रे पश्चिम विभागातील कार्टररोड जवळील शेर्ली राजन रोडवरील उच्चभ्रू वसाहती परिसरातील येथील बाई अवाबाई पेट्रीट ट्रस्टच्या मोकळ्या २२ भूखंडाची आरक्षणे बदलून हे भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यात आला आहे. याच भूखंडाजवळ आज निदर्शने करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील आरक्षणे बदललेल्या मोकळ्या जागांचा विषय ऐरणीवर आणला आहे.
वांद्रे पश्चिम येथील बाई आवाबाई पेट्रीट ट्रस्टच्या भूखंडावरील मैदाने, शाळा, महापालिका बाजार, वृध्दाश्रम,डिपी रोड, अशी आरक्षणे बदलण्यात व रद्द करण्यात आले असून सुमारे १ हजार कोटींचे ही सार्वजनिक हिताची मोकळी जागा बिल्डरच्या घश्यात घालण्यात आली आहे. याबाबत नियोजन समितीने ज्यावेळी हरकती मागवल्या त्यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी लेखी हरकत ही नोंदवली होती. त्यानंतर ही या हरकतींकडे दुर्लक्ष करून त्याबाबत सुनावणी न घेता ही आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत.
याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री पर्यावरण वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेला हाताशी धरुन मुंबईतील भूखंडांची जागांची आरक्षणे बदलून मोकळ्या जागांचा गळा घोटला जात आहे. वांद्रे पश्चिम येथील पेट्रीट ट्रस्टच्या १ लाख २५ हजार चौरस फूटांच्या २२ भुखंडाचे आरक्षण बदलून आणि रद्द करुन १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. खेळाचे मैदान, वृध्दाश्रम, बगीचा, शाळा आणि महापालिका मंडई यासाठी आरक्षीत ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. आम्ही आज पासून मुंबई वाचवा आंदोलन करुन मुंबईतील् अशा आरक्षणे बदललेल्या जागा जनतेसमोर आणणार आहोत. मुंबईत मोकळ्या जागा वाचणे आवश्यक असताना नगरविकास खात्याने मुंबई महापालिकेला हाताशी धरुन असे भूखंड बिर्डरच्या घशात घातले आहेत. असा आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.