– पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला असून पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले.
काँग्रेसचा पंजाबने ‘झाडू’न धुव्वा उडवला. दिल्लीपाठोपाठ तिथेही ‘आप’ने एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली. या निकालाने पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचेच राज्य होते, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरुन १२५ वर पोहोचला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. ओवैसी, मायावतींचे भाजपच्या विजयात योगदान आहे, हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.