राज्यात कोरोनाचा विस्फोट होत असताना तसेच रुग्णसंख्या एकीकडे झपाटय़ाने वाढत असताना, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहे. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळले नसते. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके हे पक्षसंघटना बाजूला ठेवून शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत केली. म्हणून आम्ही त्यांच्या रिक्त जागेवर होत असलेल्या निवडणुकीसाठी त्यांच्या पुत्राला मदत करण्यासाठी प्रचारासाठी आलो आहोत.
राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी प्रशासकही नेमले आहेत. या मतदारसंघाची पोटनिवडणूक तीन महिन्यांनी लागली असती तरी चालले असते. मात्र, केंद्राने ही निवडणूक लादली. अस्तित्व दाखवण्यासाठी प्रचार करणे भाग आहे, असेही ते म्हणाले.