भाजपच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या “या” मागण्या !

मुंबई : भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली.भाजपच्या या मागणीवर राज्यपालांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात आमदार विजय भाई गिरकर,योगेश सागर,कालिदास कोळंबकर, सुनील राणे,मानिषा चौधरी,राहुल नार्वेकर,मिहीर कोटेचा,पराग शाह यांचा समावेश होता.यावेळी दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दल राज्यपालांकडे तक्रार केली.

ई-पास बाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत करण्यात आले. याहीबाबत राज्यपालांनी मुख्य सचिवांनी स्वतःच्या पातळीवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: