भाजपाने धनगर समाजाला फसवले-नाना पटोले

धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने पाच वर्षं राज्यात सत्ता भोगली. पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

इस्लाम जिमखाना येथे धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नाना पटोले यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक, देवानंद पवार, अलकाताई गोडे, हरिभाऊ शेळके, ॲड. संदिपान नरोटे आदी उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असलेलं घोंगडं व काठी देऊन नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, धनगर समाज मागणारा नसून देणारा आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला.

पाच वर्षं राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीत भाजपाचेच सरकार असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी. धनगर समाजाला सन्मानाची वागणूक व समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही पटोले यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात. ऐकत कोणाचेच नाहीत. ते ऐकताच फक्त नागपूरचे, असा टोला त्यांनी लगावला. मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत. आरक्षण संपवण्याचा भाजपा-आरएसएसचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: