मुंबई | शनिवारी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळं मुंबईत आतापर्यंत चौथ्यांदा आणि डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा दिवसभरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. या आधी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जातं आहे.
डिसेंबर महिन्यात याआधी ११ आणि १५ तारखांना शून्य मृत्यूची नोंद झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईला हा मोठा दिलासा मिळत आहे. मुंबईसाठी शून्य कोरोना मृत्यू हे आता हळूहळू सत्यात येणारे स्वप्न झाले आहे. त्यामुळे मुबईवरचा कोरोना संसर्गाचा धोका कमी प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे मात्र अद्यापही सर्वांनी खबरदारी घेण्याचे आव्हान सरकारकडून करण्यात आले आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात २८३ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात २७५ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतकं झालं आहे. मुंबईत सध्या १९४८ इतक्या संख्येने सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २३२१ दिवसांचा झाला आहे.