मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याची तक्रार डॉ. जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बुधवारी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत.
या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे असे अॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. त्यावेळी रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अॅड. पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.