नागपूर | भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारीला ‘शौर्य दिन’ साजरा केला जातो. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनता येथे भेट देते. मात्र, या शौर्य दिनाला करनी सेनेचे विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन शासानाने या कार्यक्रमावर बंदी घालावी, तसेच हा विजय स्तंभ बुलडोझर लावून पाडण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे अजय सेंगर यांना अटक करावी, अशी मागणी आरपीआयने केली आहे.
आता त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीटद्वारे संताप व्यक्त केला आहे.“भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचे प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेव्हासुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिंमत केली नव्हती. होय, आम्हीही तिथे जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार.” असे ते म्हणाले.
करनी सेनेचे अजय सेंगर यांनी “इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा ‘शौर्यदिन’ या देशात कसा का साजरा होतो? राज्याचे मुख्यमंत्री हे का सहन करतात? आम्ही करनी सेनेच्यावतीने १ जानेवारी रोजी इंग्रजांविरोधात इथे जे भारतीय लढले त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेणार आहोत. कारण गद्दार भारतीयांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम भीमा कोरेगाव इथे होतो. या कार्यक्रमावर बंदी टाकावी, अशी मागणी आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.” असे म्हटले आहे.
“देशामध्ये गद्दारांचा सन्मान होता कामा नये. या देशासाठी प्राणाचे बलिदान ज्यांनी दिले आहे. त्यांचा हा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ सरकारने बुलडोझर लावून पाडला पाहिजे. हिंदू आणि बौद्ध हे भाई-भाई आहेत. यांच्यातील संबंध बिघडवण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. ही प्रथा प्रकाश आंबेडकर यांनी चालू केली. आपली राजकीय चूल पेटवण्याकरीत हिंदू आणि बौद्धांमध्ये दंगल निर्माण व्हावी , हा त्यांचा हेतू आहे.” असेही ते म्हणाले.