सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला केंद्रसरकार कडून परवानगी मिळत नाही. तसेच भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
आता या आरोपावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात मलिक यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री नवाब मलिक विरोधात तक्रार दाखल केली आहे. भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच राज्य सरकारने पुढील ४८ तासांत मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.