भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी नाना पटोलेंसह या काँग्रेस नेत्यांचा पहाटेच सराव

 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या 7 तारखेला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी काँग्रेस नेते जोरदार तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत चालावे लागणार असल्याने अनेक काँग्रेसचे नेते सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत.आज भल्या पहाटे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार कल्याण काळे यांनी विद्यापीठात मॉर्निंग वॉक केलं.

बरेच राजकीय नेते सकाळी मॉर्निंग वॉक करीत असतात. मात्र, काही जणांना कामाच्या प्रचंड व्यापामुळे रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे, सकाळी लवकर उठणं शक्य होत नाही.परंतु राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी वेळात वेळ काढून मॉर्निंग वॉक सुरू केलं आहे. नाना पटोले यांनीही रात्री 2 वाजेपर्यंत औरंगाबदमध्ये काम केलं.

मात्र ते सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकला हजर राहिले. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नांदेड, हिंगोली, शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. भारत जोडो यात्रा आपल्यासाठी एक संधी आहे. या संधीचं सोनं करा. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे या भावनेतून प्रत्येकाने काम करा. त्यामुळे पक्ष वाढण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तामिळनाडूपासून कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत यात्रेला सर्वाधिक प्रतिसाद मिळणार असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. यावर आता विरोधक कोणत्या प्रकारे टिपण्णी करतायत हे सुद्धा पाहावे लागणार आहे.

 

Team Global News Marathi: