सकाळी उठताच मोबाईल हाती घेणाऱ्यांनो सावधान, ‘या’ समस्यांना देताय आमंत्रण

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल ही चौथी अत्यावश्यक गरज मानवाच्या आयुष्यात निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला मोबाईल या तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. मात्र काही लोकांना प्रत्येक क्षणाला मोबाईल हवा असतो. सकाळी उठल्यावर, टॉयलेटमध्ये गेल्यावर, जेवताना आणि रात्री झोपतानाही मोबाईल जवळ हवा असतो. परंतु मोबाईलचा अतिवापर घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेकांना सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल हातात घेऊन सोशल मीडियावर फिरकण्याची सवय असते. परंतु यामुळे तुमच्या आरोग्यावर चुकीचा प्रभाव पडत असल्याचे सिद्ध झाले आहे.

नुकताच युनायडेट किंगडम (युके)मध्ये 2000 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये जे लोक सकाळी उठल्याक्षणी मोबाईल हातात घेतात त्यांची दिवसाची सुरुवात स्ट्रेस अर्थात ताण-तणावाने होते असे दिसून आले. यामुळे त्यांना दिवसभर काम करताना अडचणी निर्माण होतात.

सकाळी लवकर उठून लोक फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर नोटिफिकेशन पाहात बसतात आणि त्याच विषयाबाबत विचार करतात. त्यामुळे आपण दुसऱ्या विषयांबाबत विचार जास्त करत नाही. यामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो.

सर्व्हेमध्ये असेही दिसून आले की सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोळ्यांनाही त्रास होतो आणि दृष्टी हळूहळू कमी होत जाते.

सकाळी सातत्याने एकाच विषयाचा विचार केल्याने तणाव वाढण्याचा आणि ऐंग्झायटी होण्याचा धोका वाढतो. यादरम्यान अनेक लोकांना रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे दिसून आले.

सकाळी सकाळी नोटिफिकेशन वाचून आपण त्याच गोष्टीचा विचार करतो आणि वर्तमान विसरून भूतकाळाचा विचार करतो. यामुळे तुमचे मन स्थिर राहात नाही.

तज्ज्ञांच्या मते सकाळी उठल्याक्षणी फोनचा वापर अयोग्य आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा योगा आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते आणि प्रकृतिही सुदृढ राहते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: