“बेताल शहर नियोजन अन् दिखाऊ स्मार्ट सिटी”; पुण्याच्या धोधो पावसाने राजकारण तापले

 

सध्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची स्थिती धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. अलीकडेच पुण्यात दोन तासांत सुमारे १२५ मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. यावरून शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेने आपले मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली.

‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे!, या शब्दांत शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढीत आहेत, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. पुण्याच्या तथाकथित विकासाचे रस्त्यारस्त्यांवर जलार्पण झाले. पुणे महापालिकेत सत्ता राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले.

मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते पावसाने दाखविले. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे

Team Global News Marathi: