अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर चक्क २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्हयातून समोर आली होती. या घटनेनंतर मृतदेहांबरोबर होत असलेल्या वागणुकीवरून स्थानिक प्रशासन आणि महाविकास आघाडी सरकारवर सर्व बाजूंनी जोरदार टीका करण्यात आली होती यावर आता भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य करत आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
एकाच अॅम्ब्युलन्समध्ये 22 जाणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना करण्यात आली होती. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. त्या २२ लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मी ऑयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली.
रुग्णालय प्रशासनाने स्वत:ची जबाबदारी कलेक्टरवर ढकलली, कलेक्टराचं असं झालंय की ते बोलूच शकत नाहीत. बीड जिल्ह्यात सध्या आघाडी सरकारने अत्याचार करायचं ठरवलंय आहे. त्यामुळे प्रशासनाने हात टेकले आहेत. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. पंकजा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीनं लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंकजा यांनी केली आहे.