युवा सेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून सुरवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतायत. आज निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दहिसरमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना आवाहन केलं आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनहि मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन केले आहे. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल. तसेच ज्यांना तिथे राहायचे असले, त्यांनी हिंमत असेल तर निवनडणुकांना सामोरे जावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
दरम्यान, याच वेळी बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला. जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारं सदैव खुली असतील, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.