बाबासाहेबांनी इतिहास कधीच मोडून- तोडून सांगितला नाही;

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरांत पोहोचवलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज (१४ नोव्हेंबर) अखेरचा श्वास घेतला. शंभराव्या वर्षी त्यांचं निधन झालं तर संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी त्याचं निधन झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ३ दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जातो आहे. त्यासच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच. नुकतेच त्यांचे १०० व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,’जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा. बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता.ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: