‘पठाण’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असून दुसरीकडे त्याच्या प्रदर्शनावरून होणार वाद काही कमी होत नाही. राज्यभरात सर्वच चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केल्यामुळे मराठी चित्रपटांची गळचेपी केल्याची टीका मनसेने केली होती.यावरून आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
खोपकर म्हणाले की, “हर हर महादेव चित्रपटाच्या वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?” अशी घणाघाती टीका केली.पठाण चित्रपटामुळे अनेक ठिकाणी चांगले चालत असलेले ‘वेड’, वाळवी’ सारखे मराठी चित्रपट तसेच, ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अत्यंत कमी शो देण्यात आले.
याच मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली असून “पठाणचे भले करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच हवा. मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावे, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो,’ असा सज्जड दम त्यांनी भरला होता. “शाहरुख खानचा कमबॅक आहे, म्हणून मल्टीप्लेक्सवाल्यांनी ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या चित्रपटांचा बळी का द्यावा?” असा सवाल त्यांनी विचारला होता.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2023