शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित मंत्री कामाला लागले आहे. दरम्यान कृषीमंत्री पदाची जवाबदारी मिळताच अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपल्या कामाला सुरवात केली आहे. कृषीमंत्री पदाची घोषणा होताच त्यांनी दुसऱ्याच दिवशी जालना येथे मराठवाडा विभागाची बैठक बोलावून आढावा घेतला. त्यांनतर आता आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचं सत्तार म्हणाले आहे.
अब्दुल सत्तार यांनी सोमवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची विभागीय बैठक घेतली. बैठकीत कृषी विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस सर्व अधिकाऱ्यांसह शेताच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेवून याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं सत्तार म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी आणि माझ्या खात्याचे अधिकारी दर आठवड्यात एका गावात जाणार आहोत. त्या गावात गेल्यावर शेतकऱ्यासोबत एक दिवस घालून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या समस्या कळणार नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याच अब्दुल सत्तार म्हणाले आहे