मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या सात वर्षांतील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे अर्थात मागे घेऊन गेला आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस आज राज्यभर निदर्शने करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मोदी सरकार सत्तेत आल्यावर वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसांत महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाणे दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले, पण सात वर्षांनंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करू शकले नाहीत असा टोला मोदी सरकारला लगावला आहे.
मोदींच्या या जुलमी, अहंकारी, हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या, रविवारी ३० मे रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोदी सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळे ठेवले जातील. तसेच राज्यातील प्रत्येक विभागात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील असेही नाना पटोले यांनी म्हंटल आहे.