मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो… नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या. आम्ही तयार आहोत!, असं आव्हानच शेलार यांनी आघाडीला दिलं आहे.
दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागला आहे. या १९ जागांपैकी ११ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे राजन तेली आणि महाविकास आघाडीचे सतीश सावंत हे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाची अवस्था गड आला, पण सिंह गेला अशी झाली आहे.