पुणे | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्याविषयी आदर व्यक्त केला. सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी पुण्यातील सिंहगडाला भेट दिली.
भारतात छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या अवताराच्या रुपात आले. मोघल साम्राज्याचा अंत करण्यात आणि भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांनी ज्या बुद्धी, युक्ती आणि शक्तीचा वापर केला आणि राज्य केलं, त्याद्वारे एक प्रकारे एक नवी चेतना देशात जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत. तसेच जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी राज्यपालांनी आपण शिवाजी महाराजांबद्दल ५० वर्षांपूर्वी वाचन केल्याचं सांगितलं. “मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल. कारण शिवाजी हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत”