मुंबई | मुंबईत क्रूझवर आयोजित पार्टीवर केलेली छापेमारी निव्वळ स्टंट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊना जाताना दिसणारे व्यक्ती एनसीबीचे कर्मचारी नसून भाजपाचे कार्यकर्ते असल्याचं गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला. आता या टीकेचा आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे.ते म्हणाले, अपेक्षेनुसार नवाब मलिक यांनी अंमली पदार्थांच्या कारभाराविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या NCB वर निशाणा साधला आहे. NCB वर खंडणीखोरीचा आरोप करणाऱ्या मलिक यांनी ड्रग्ज घेणाऱ्यांची बाजू घेण्यासाठी किती खंडणी घेतली याचे उत्तर द्यावे. जावयाने दिले तरी चालेल असा टोला देखील लगावला आहे.
काय म्हणाले होते नवाब मलिक
आर्यन खानविरोधातील कारवाई हा निव्वळ फर्जीवाडा असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. पुढचं टार्गेट शाहरुख खान असल्याचं एक महिन्यापूर्वीच क्राईम रिपोटर्सना सांगण्यात आलं होतं. पत्रकारांना ऑफ द रेकॉर्ड ही माहिती देण्यात आली होती. आता पत्रकारांनीच हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले.