नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे योगी आणि मोदी सरकारविरोधात काँग्रेससह सर्व विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. यातच या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला आव्हान दिले आहे. येत्या ८ दिवसांत अटकसत्र सुरू झाले नाही, तर मोठे आंदोलन करू, असा इशारा टिकैत यांनी दिला.
टिकैत म्हणाले की, लखीमपूर खिरी घटनेप्रकरणी आगामी आठ दिवसांत अटकसत्र सुरू झाले नाही, तर राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येईल. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी टिकैत यांनी लावून धरली आहे.
लखीमपूर खिरी घटनेसंदर्भात आमचा विरोध कायम असून, तो शमलेला नाही. आम्ही केवळ आठ दिवस प्रतीक्षा करू. आठ दिवसात सरकारकडून ठोस पावले उचचली गेली नाहीत. अटक झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. सरकारशी झालेल्या चर्चेबाबत सर्वांनीच समाधान व्यक्त केले. मात्र, त्यानंतर सरकारने कारवाई करायला सुरुवात केली नाही, असा दावा टिकैत यांनी केला आहे.