मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं होत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु झाले होते. त्यातच आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही. तुमच्या चुकीमुळे 700 कुटुंबांना नुकसान भोगावं लागत आहे. त्यामुळे त्यांना पीएम केअर फंडातून तातडीने आर्थिक मदत करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. तीन कृषी कायद्याविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत आंदोलन झालं. सरकार ऐकायला तयार नव्हतं. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकार झुकलं. या आंदोलनात शेतकरी मृत्यू झाले. ७०० हून अधिक शेतकरी दगावले. आता जर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत असेल तर त्यात चूक काय आहे? पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडले आहेत असे त्यांनी म्हणून दाखविले होते.
तसेच त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी. देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यासाठी मदत करा. तुम्ही जी चुकी केली त्याचं नुकसान ७०० कुटुंबांना भोगावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले. यावर आता भाजपा नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.