“अनिल परबांना एसटी कर्मचारी वर्गाचा उद्रेक घडवायचा आहे”

 

परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यातच काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळ हा प्रश्न अजूनच चिघळला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. तसेच, राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचं देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्यानंतर त्यावरून आता भाजपानं जोरदार टीका केली आहे.

या कृतीमधून ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. “मराठी एस.टी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही, हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झाले आहे. एखादा व्यक्ती जेव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळेस त्याच्यावर बिकट परिस्थिती असते. अशा वेळेस त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायचं असतं. पण यांनी कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मिडीयाद्वारे धमकी देणे असे प्रकार सुरू केले आहेत”, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असं देखील पडळकर म्हणाले आहेत. “जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचाय. जेणेकरून पोलिसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल असं पडळकर यांनी बोलून दाखविले आहे.

Team Global News Marathi: