मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील फायर ब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनीही फेसबुक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. ईडीने देशमुख यांना अटक करतानाच त्यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी मारून त्यांच्या एकूण ११ मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने आता महत्त्वाचे आदेश देतानाच ईडीला फटकारले असून त्यांच्या सर्व मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिले.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची दखल घेत ईडीने देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर देशमुख यांनना अटक केली होती. या धाडी दरम्यान ईडीने देशमुखांच्या ११ मालमत्ता जप्त केल्या होत्या. 180 दिवसानंतर ईडीने ही कारवाई केली होती.
आता कायद्यानुसार १८० दिवसानंतर मालमत्ता जप्त करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १८० दिवसानंतर मालमत्ता जप्त केल्याप्रकरणी ईडीला फटकारलं असून अनिल देशमुख यांचे पुत्र आणि सूनेलाही मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचं वृत्त मॅक्स महाराष्ट्राने दिलं आहे.