मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे . एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अमळनेर ST बस दुर्घटनेसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असं शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली, तसंच मंत्र्यांना घटनास्थळी पाठवल्याची माहितीही शिंदे यांना दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची माहिती घेतली असून महाराष्ट्राकडून त्यांना योग्य ती मदत दिली जाणार आहे. विमानसेवाही उपलब्ध केली आहे, अशी माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे.
अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मध्यप्रदेशमधील घटनेची माहिती देऊन मदत मागणीसाठी त्यांनी ही भेट घेतली. अपघातग्रस्त बसमध्ये अमळनेरमधील प्रवासी होते. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
‘इंदूर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे.