सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याकडे मागणी !

मुंबई : सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावं लागतं. यासंदर्भातील निर्णय तत्काळ घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असं असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेचच या संदर्भातील मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

 

 

Team Global News Marathi: