पश्चिम महाराष्ट्रातील पूर्ण पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणाच्या पाण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. त्या अनुषंगाने याविषयी आपण कर्नाटक राज्याच्या जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दिली. पावसाळय़ाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी व्हीसीद्वारे साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पूर नियंत्रणासाठी सांगली जिह्यातील यंत्रणा सज्ज असून पावसाचा अंदाज पाहून खबरदारीने पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तर राज्यात पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याची सूचना जयंत पाटील यांनी यावेळी दिली. धरणाच्या जलाशयात येणारे पाणी आणि केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची सूचना केली.
तसेच धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानकपणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी, असे आदेश दिले. विदर्भात होणाऱया अतिवृष्टीमुळे या भागात मोठय़ा प्रमाणात पूर येतो. हा पूर नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व पर्याय अमलात आणावे. नदीनाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवण्याची सूचना जयंत पाटील यांनी केली.