राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच अनेक आमदारांसह सत्तेमध्ये सहभागी होतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या.अजित पवारांनी या बातम्यांचं खंडन केलं, पण कालच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपला 2024 ला नाही तर आताच मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याचं मोठं विधान केलं, त्यामुळे या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. एकनाथ शिंदे सध्या तयार होत आहेत, ते तयार होईपर्यंत त्यांचं मुख्यमंत्रीपद जाईल, असं अजित पवार म्हणाले होते.
अजित पवारांच्या या विधानावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. स्वत:चे कार्यकर्ते स्वत: बरोबर टिकले पाहिजेत, आमदार टिकले पाहिजेत, त्यामुळे सरकार सोमवारी पडणार आहे, पुढच्या महिन्यात पडणार आहे. दिवाळीला पडणार आहे, शिमग्याला पडणार आहे, असं अजितदादांनी 25 वर्ष सांगत राहावं, असा टोला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.
अजितदादांसाठी शिवसेनेची अट अजित पवार हे प्रशासक आहेत, त्यांनी विचारधारा बदलली आणि तो निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर अजितदादा आमच्यासोबत येण्यास आम्हाला काहीही अडचण असण्याचं कारण नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे अजित पवार येत असतील तर त्यांचं स्वागत करू पण राष्ट्रवादी आली तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं.