अजित पवारांना पंढरपूरच्या तवटेकराचा ओवा खायला द्या

अजितदादांनी मंत्रीमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचे कारण नाही. राज्यात चांगला कारभार सुरु आहे. मंत्रीमंडळ विस्तार थोड्याच दिवसात मार्गी लागेल. अजित दादा पवार आणि जयंत पाटील यांच्या जास्त पोटात दुखायला लागले आहे. त्यामुळे पंढरपूरच्या तवठेकरांच्या दुकानातून ओवा खायला द्यायचा आहे, अशी खोचक टीका शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज येथे केली.

आमदार पाटील हे कराड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सुधाकर नाईक यांच्यावेळी झालेल्या बंडामुळे पावणे दोन महिने मंत्रालय बंद होतं. अजित पवार त्यात राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचे काही कारण नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा कारभार चांगला चालला आहे. त्यांनी घेतलेले निर्णय अजित दादांनी पत्रकारांसमोर ठेवावेत.

खासदार संजय राऊत यांच्यावरील इडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ईडी कोणालाही अटक करु शकत नाही. जर संजय राऊत निर्दोष आहेत असं त्यांच्या बंधूना म्हणायचे असेल तर कोर्टासमोर निर्दोषत्व का सिध्द करु शकला नाही. ते सिध्द करुन जामीनावर सुटुन बाहेर यावे. ते जर तुम्ही सिध्द करु शकला नाही तर जे जगासाठी ते तुमच्यासाठीही आहे. तुम्ही स्वतःला स्पेशल केस समजु नये.

Team Global News Marathi: