कोरोनाच्या संकटात हैदराबाद मधील प्रसिद्ध औषध कंपनी भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे. तसेच लवकरच प्रकल्पासाठी सरकारकडून २८ एकर जागा कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. त्याचबरोबर आवश्यक यंत्रसामग्रीसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मात्र आता या भारत बायोटेकच्या पुण्यातील प्रकल्पावरून भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. प्रकल्प विदर्भात होणार होता, मात्र पवारांनी तो पुण्याला पळवला, असं खोपडे यांनी म्हटलं आहे.
आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. “नागपूरमधील मिहान परिसरात सिरम आणि भारत बायोटेकला निमंत्रित करण्यात आले होतं. भारत बायोटेकची इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्याचे निर्देशही दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मिहान प्रोजेक्टबद्दल माहिती होती. असं असतानाही विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही असे आमदार खोपडे म्हणाले.
पुढे आघाडीमध्ये असलेल्या विदर्भातील नेत्यांना आवाहन देताना खोपडे म्हणाले की, “नवे प्रकल्प आणण्याची हिंमत नसलेल्या विदर्भातील नेत्यांनी किमान आलेले प्रकल्प थांबवण्याची सुद्धा हिंमत दाखवली नाही. विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी अधिकारी धडपड करतात. मात्र त्यांना राजकीय स्थान मिळत नाही. त्यामुळे ते पळविले जातात. ही विदर्भासाठी दुर्दैवी बाब असून, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते गप्प का बसले?; असा सवाल खोपडे यांनी केला आहे.