मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट घेतली. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग आणि चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट मागितली होती. एकूण १२ विविध मुद्द्यावर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. या भेटींनंतर भजच्या गोटात खळबळ माजली आहे.
पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली असतानाच राज्यात फडणवीस यांच्या बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, फडणवीसांनी बोलावलेली बैठक ही पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक असून त्याचा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भेटीशी काहीही संबंध नसल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर ती चांगली गोष्ट आहे. राज्याने जर केंद्राशी समन्वय ठेवला तर राज्याचा फायदा होतो. या दोन्ही नेत्यांमध्ये वेगळी भेट झाली असेल तर त्याच आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. मोदींसोबत झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत त्या भाजपप्रणीत आहेत. विरोधकांनीही आपले शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावे आणि मराठा आरक्षणाबाबत आपली बाजू मांडावी अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांशी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांची बैठक झाली ही चांगली गोष्ट आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राबद्दल दिल्लीचा आकस नक्कीच कमी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे सरकार मान्य केले आहे अशी माहितीराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.