बहुचर्चित अभिनेता बॉबी देओल यांच्या आश्रम या वेब सीरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तसेच या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. त्या पाठोपाठ ‘आश्रम ३ च्या शूटिंगला भोपाळमध्ये सुरवात झाली होती. मात्र काही दिवसातच या वेब सीरिजच्या सेटवर बजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी मोठा गदारोळ घातला होता.
यादरम्यान प्रकाश झा यांच्या चेह-यावर शाई फेकत या कार्यकर्त्यांनी सेटवरच्या साहित्याची तोडफोड केली. इतकंच नाही सेटवरच्या काही क्रू सदस्यांचा पाठलाग करून त्यापैकी एक-दोघांना पकडून त्यांना मारहाण करत व्हॅनिटी व्हॅनसह ५ वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात ४ ते ५ कर्मचारी जखमी झाले होते. आता या प्रकरणात भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा यांनी भाषा करत दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर टीका केली आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत भक्ती आखाडा वेब सीरीज, स्क्रिप्ट आणि चित्रपटांच्या सामग्रीचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करेल. एवढेच नाही तर, गरज पडल्यास वादग्रस्त चित्रपटांची निर्मिती होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रज्ञाने ‘आश्रम’ मालिकेच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंगही थांबवण्याची धमकी दिली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली सनातन धर्माची विटंबना आणि अपमान केला जात असल्याचा आरोप प्रज्ञा यांनी केला आहे.
भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, मी संन्यासी असल्यामुळे साधूंच्या वेदना समजू शकते. ‘आश्रम’ हा शब्द ऐकताच मन प्रसन्न होते आणि चांगल्या भावनांचा संवाद होऊ लागतो, पण ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. आता हिंदूंच्या भावना दुखावणारे चित्रपट बनवले जात आहेत. हे सर्व आता फक्त मध्य प्रदेशातच नाही, तर संपूर्ण देशात थांबले पाहिजे.