मुंबई – माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करताना सुरुवातीपासूनच गद्दार हा शब्द वापरला होता. गद्दार, विश्वासघातकी आणि पाठित खंजीर खुपसला असे म्हणत आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर जबरी टिका करत आहेत. आदित्य ठाकरेंचा हा पवित्रा विधिमंडळाच्या अधिवेशन काळातही कायम आहे. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पलटवार केला आहे. त्यानंतर, आता मंत्री उदय सामंत यांनीही आदित्य ठाकरेंना गद्दार या शब्दावरुन सुनावलं आहे.
आदित्य ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधत विश्वासघातकी असे म्हणत हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, आजही विधानसभेत ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी’, अशा घोषणा पाहायला मिळाल्या आहेत. त्यावरुन, मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंसह आघाडीच्या नेत्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला.
‘गद्दार या शब्दाची व्याख्या मला कळत नाही. त्यामुळे गद्दार या शब्दाची व्याख्या महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली पाहिजे. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगताय की, आमची नैसर्गिक आघाडी नव्हती. ही आघाडी कशी झाली, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती तर काही म्हणण्याचे कारण नव्हते. पण, शिवसेना आणि भाजप एकत्र लढली. मतदारांनी आम्हाला संधी दिली. त्यानंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दारी होत नाही का? असा सवाल सामंत यांनी सभागृहात उपस्थितीत केला.