ठाणे | शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यांमध्येच समन्वय नसल्याची टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात केली. मंत्री वेगवेगळी घोषणा करतात, सरकार वेगळीच घोषणा करते आणि टास्क फोर्स काही तरी तिसरेच ठरवते. यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यामुळे एक ठाम निर्णय सरकारने जाहीर करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
संस्कार स्टडी क्लाऊड लोकार्पण सोहळ्यासाठी ते ठाण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्क फोर्सच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा, जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने बुधवारी १२७ वी घटनादुरुस्ती करून, कुठल्याही समाजाला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. मराठा आरक्षण आम्ही दिले, ते उच्च न्यायालयात टिकलेही होते. महाविकास आघाडी केवळ राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसून वेळकाढूपणा करत आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.