हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून शिवसैनिक एकीकडे मातोश्री बाहेर पहारा देत असताना दुसरीकडे राणा दाम्पत्य आपल्या विधानावर ठाम आहेत. अशातच शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतोय, तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. तसेचहनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले.
शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले पाहिजे. आता बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं असे रवी राणा म्हणाले. पोलीस आम्हाला रोखत आहेत, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही यावेळी रवी राणा यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला विरोध करत असल्याचे ते म्हणाले. शिवसैनिक गुंडगर्दी करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर जात आहे. मी त्याठिकाणी महाराष्ट्राच्या शांततेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जात असल्याचे राणा यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. सध्या मुख्यमंत्री मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचे राणा म्हणाले.