पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. या बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवण्यात आलेलं असून, हिंदुत्वाऐवजी महाविकास आघाडीकडे प्रवास करत असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
यानंतर भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना, “त्यांनी तीन दिवस घोषणाबाजी केली, आम्ही दोनच दिवस घोषणा केली, जी त्यांच्या वर्मी लागली आहे. कोण काही विचारतंय का याची आम्ही वाट पाहत होतो, पण कोणी काही विचारलं नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे. आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण तुम्ही अंगावर आलात, तर आम्ही हात बांधून बसणार का. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत,” असं ते म्हणाले.
“आमची काही चूक असेल तर दाखवून द्या, माफी मागू. पण उगाच सहन करणार नाही. आम्हाला कोणाच्या घरापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तुम्ही शिस्त पाळल्यास, आम्हीदेखील पाळू, उगाच आम्ही डिवचणार नाही”. “कालचा प्रकार निंदनीय होता. आमच्या घोषणा झाल्यानंतर त्यांनी यायला हवं होतं. त्यांनी आम्हाला डिवचलं. आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला होता.