शालेय शिक्षण खाते दीपक केसरकरांकडे आले, हे खाते त्यांनी स्वीकारलं तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी वेगवेगळ्या गोष्टी ऐकून होतो. जुन्या आठवणीही आहेत. मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मला प्रेमाचे सल्ले दिले होते खाते न घेण्याबाबत.शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. देशात शिक्षणाचा अधिकार आहे परंतु दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे असं शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी विधानभवनात बोलून दाखविले.
आपल्या देशाला सुपर पॉवर बनवायचं असेल तर हे स्वप्न केवळ शिक्षणाच्या जोरावर पूर्ण होऊ शकतं. प्रत्येक लहान गोष्टींवर विचार केला तर शिक्षणासाठी महाराष्ट्रात नवी संधी उभी करू शकतो असं शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभेत म्हटलं. प्राथमिक शिक्षण खात्याच्या पुरवणी मागणीवर ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शालेय शिक्षणावर बोलताना ३ गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. विकास, अभ्यासक्रम आणि कौशल्य अभ्यासक्रम, शाळांच्या इमारतीची डागडुजी नसते. रंगरंगोटी नसते. दरवाजे तुटलेले असतात. बाथरुम खराब असते. वर्ग काळोखात असतात. वर्ग कसा असतो यावर लक्ष दिले पाहिजे.
तसेच पुरेसा प्रकाश वर्गात आहे का हे पाहिले पाहिजे. शाळा उद्धाटन करता बाथरुममध्ये जाळ्या असतात परंतु त्यावर मोठं भोक पडलेले दिसतं. ज्यातून आरपार पाहिलं जाते. टॉयलेट आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था एका भितींवर नको. प्रत्येक शाळेत कॅन्टीन असणे गरजेचे आहे. शिक्षक, स्टाफसाठी बसण्याची योग्य व्यवस्था असावी असं त्यांनी सांगितले.