राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप नेत्यांची भेट घेतली. “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव यावेळी भाजप नेत्यांना देण्यात आला. त्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली या बैठकीनंतर भाजपा आपला निर्णय जाहीर करणार असून या बैठकीवरून मनसेने आता महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे.
मनसे नेते सतीश नारकर यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीचा फोटो शेअर करत “महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत मदतीसाठी फडणवीसांच्या दारी “गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा” असे ट्विट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
आज एकीकडे महाविकास आघाडीचे नेते प्रामुख्याने भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका करत असताना दुसरीकडे मात्र राज्यसभा निवडणुकीच्या मदतीसाठी थेट आघाडीचे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दारात गेल्यामुळे त्यांचे हसू होताना दिसून येत आहे मात्र या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमच्यासाठी व पक्षासाठी राज्यसभा महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार आहोत असे ठणकावून सांगत आघाडीच्या नेत्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला.